मुंबईसह देशभरात घुमला थाळ्या, टाळ्या आणि घंटानाद

देशावर ओढवलेल्या करोना साथीच्या संकटातही अहोरात्र सेवा देत असलेल्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांना आज अवघ्या देशाने सलाम केला. जनता कर्फ्यूदरम्यान सायंकाळी ठिक पाच वाजता घराच्या खिडकीत येऊन, गच्चीवर जाऊन लोकांनी शंख, टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून जिगरबाज कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ दिले. अवघ्या देशात एकाचवेळी घंटा आणि थाळीनाद घुमला.

मुंबईतील लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संकटाशी सामना करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकत आज सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देशाला केले होते. या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासूनच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात शुकशुकाट दिसत होता. रस्त्यांवर चिटपाखरूही दिसत नव्हते. एरव्ही गजबजून जाणारे मुंबईतील रस्ते आज निर्मनुष्य झाले होते.